Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

सारांश

मी मला विसरूनिया, सर्व धागे सांधले, मज-जसे अनेक मी, सोबतीस बांधले उचलता मग वालुका, मृद्स्पर्श सुखावला खडा दिसे एक त्यात, उचलुनी भिरकावला सडा वेचता फुलांचा, सुवास मनी स्थिरावला चित्तास.. तो स्पर्श होता, तापही मग सांडला मन्मनीचे गुजही, गुपित म्हणूनी पेरले न बोलता कुणासवे, नयन परी ओसंडले जमा खर्च जीवनाचा, जरी कधी मी मांडला, सर्व बाकी शून्य हाची, अर्थ हाती लागला रोजचेच सुख ते, रोजचेच दुःखही रोजचाच तो प्रपंच, रोजचा परमार्थही का फसावेत ताळे, का निवाव्या सर्व पणत्या का नसावे अमर सारे, का चळाव्या दिव्य मत्या सांडली ती वालुका, कोमेजले प्राजक्तही शोष पडले नेत्र अन् संपला परमार्थही आजचाची प्रहर सिद्ध, उद्या कुणी न पाहिला कल्पनेच्या संभ्रमी, मनुष्यप्राणी वाहिला ©️विजयकुमार पानसरे