Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

मातृभाषा

एक गंमत सांगतो, सिंगापूर ला असताना बरेच जण सोबत मराठी होते. त्यामुळे एकमेकात मराठीच जास्त करून वापरत असू. पण आपल्याला बरेच इंग्रजी शब्द घुसवून बोलायची घाणेरडी सवय असते. त्यामुळे त्या चीनी, तामिळ, मलय लोकांना अंदाज यायचा की आम्ही काय बोलतोय. सावरकर आठवले🙏🏻, प्रत्येक शब्द मराठीत सुरू झाला. म्हणजे उदाहरण म्हणून... project साठी प्रकल्प Manhours साठी मनुष्यतास Director साठी संचालक Company साठी संस्था Deputation साठी प्रतिनियुक्ती वगैरे. एकूण एक शब्द मराठी बोलायचो. खूप मजा यायची आणि मातृभाषेचे महत्व जाणवायचे आणि अभिमान ही वाटायचा. तिथे असलेले तामिळ लोक स्वतःच्या भाषेतच एकमेकांशी बोलायचे, त्यांची भाषेविषयीची कट्टरता इतकी का होती तेही उमगायला लागले. मग अशी परिस्थिती तयार झाली की आम्ही काय बोलतोय, एकही शब्द इतरांना कळेना. तिकडेही भाषानिहाय गट होतेच. आपलाही एक गट तयार झाला. महाराष्ट्रात असताना मातृभाषेचे महत्व काय.. हे मनात असले तरीही जाणवत नाही. पण तीच आपली ओळख असते, अस्तित्व असते. ©️विजयकुमार पानसरे

समशेर

अंधार दूर सरला,लक्ख पहाट झाली सजली धरा मराठी,बुट्टीलुगडे ल्याली ओलांडुनिया सारे,ग्रहताऱ्यांचे पसारे धाडले श्रीहरीने, किल्ले शिवनेरी निद्रा बहु दिनीची,आज असे सरली पुत्र जन्मला गडी, जिजाऊ आई झाली मातेच्या कडेवरूनी, मिरवीतसे खुशाल बुरुज जुन्नर पेठ, सदर नी महाल गोंडस म्हणे कोणी, कधी राजबिंडे राजांचे प्रतिबिंब जणू, म्हणती कोणी लाडे देवकथा ऐकोन,वर्षे सरली थोडी शिक्षण सुरू जाहले, वाटे अवीट गोडी भाषा विद्या कला,संतांची शिकवण राज्यभ्यास कधी तो,कधी हरिकीर्तन युद्ध तालीम रोजची, नेमे जोर बैठका तलवार ढाल अभ्यास, भाला दांडपट्टा दिवसागणिक मनीची, प्रतिमा स्पष्ट झाली निराश चर्चा कानी, नसे कुणीच वाली दिपावली तरीही, अंधार दाटलेला माणुसकीवर घाला, गनिमाने घातलेला कोवळ्या वयास माझ्या, एक जाणीव झाली प्रत्युत्तरात हवी ती, रणधुरंधर खेळी दुष्टसंहारे सह्याद्री, संग्रामी सरसावला आबा दुरांतरावर, खेळवीत त्या शहाला पुरे झाला छळ तो, लोपलीसे प्रतीक्षा हे राज्य व्हावे हि तो, श्रींची इच्छा सोबतीला सखे, अन् शुभाषिश सारे प्रतिज्ञेस साक्षी, गड सूर्य चंद्र तारे रायरेश्वरास साक्षी, रुधिराभिषेक झाल...

जन्म

वृथाचा अभिमान सारा वृथाच्या या वल्गना वृथाचे हे विश्वही अन् भाववेड्या कल्पना । वृथाचे ते क्षणिक मित्र वृथाच्या त्या मैत्रिणी वृथाचे सारे बहाणे अन् संधीसाधू स्वार्थही । मिथ्या आहे हास्य सारे अन् उगाचंच चौकश्या वृथा ची आत्मीयता अन् मिथ्य या दाही दिशा । नको झाले सर्वकाही नको रमणे साऱ्यात या नकोच ते कोणास कोणी विश्वाच्या पसाऱ्यात या । म्हणे कोणी निराशावादी खुशाल म्हणावे तयाने कधी चाला मजठायी अट ही... माझ्या बुटाने। कळेल कधी का न कळे माणसाची प्रत माणसाला कोण माणूस शोधताना जन्म आला जन्म गेला। ©️विजयकुमार पानसरे