शोभावे दिस पुन्हा, ऊन सावल्यांनी
भिजावे मन पुन्हा, चिंब चांदण्यानी
सरावी उदासी, ल्यावा चैतन्याचा नूर
मातीमोल सारा स्वार्थ, यावा मायेला बहर
ओसरावा सर्व काठ, पुन्हा जीवन फुलावे
देव घेऊन मस्तकी, लोका आनंदे डुलावे
निवळाव्या साऱ्या चिंता, सुख पुरून उरावे
लाख पाखरांचे थवे, उंच आकाशी उडावे
दूर वाटेतले खोडे, व्हावे जीवन प्रवाही
सुटतील सारी कोडी, जरी उरलीत काही
व्हावे मळभही दूर, लख्ख उजेड आकाशी
गीत गाईन नव्याने, गाठ बांधुनी मनाशी
©️विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment