गरजले आकाश सारे, झाकोळला तो रवी
अंधारल्या आसमंती, का मोहरेल पालवी
वाहिल्या त्या पायवाटा, धेय धुसरले जराशी
न्हाऊनिया मीही निघालो, स्वप्न घेऊनि उराशी
क्षणेक विसावलो जरी, नसे प्रवास संपला
मनी असे नवी उमेद, विचारांची शृंखला
ऋतु कधी न थांबले, मी ही नच थांबलो
तोडुनिया बंध सारे, पुढे जरा सरसावलो
पुन्हा थबकलो फिरुनी, वळूनी मागे पाहिले
आलो ती वाटही, अन् ठसेही वाहिले
सर ती सांडून गेली, उघडले नभही जराशी
कोवळ्या किरणांनी मग, केली हुशारी धुक्याशी
लक्ष दिसे माझे, मजला खुणावू लागले
प्रतंचा ताणुनी पार्था, पाहिजे ते भेदीले
मार्ग आक्रमीला आता, वाट बनवुनिया नवी
मीही एक वाटसरू, निश्चित... पण निनावी
©️विजयकुमार पानसरे
Comments
Post a Comment